कणकवलीतील पवित्र तीर्थक्षेत्र
परमहंस भालचंद्र महाराज हे एक अलौकिक दिव्य शक्ती होते. आजन्म तपश्चर्येत राहून भक्तांचे दुःख दूर करणारे महान संत होते. ते सदैव मौन अवस्थेत व दिगंबर स्थितीत राहत असत.
देशभरातून सर्व जाती, धर्म आणि पंथांचे भक्त दर्शनासाठी येतात. भालचंद्र महाराजांचे कणकवलीतील आश्रम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
८ जानेवारी १९०४ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावी परशुराम ठाकूर व आनंदीबाई यांच्या पोटी जन्म झाला.
संन्यास घेतल्यानंतर गारगोटी मार्गे दानोली येथून कणकवलीत आगमन झाले. येथेच त्यांनी आपली तपश्चर्या सुरू केली.
जुन्या मोटर स्टँडवर किंवा काशीविश्वेश्वर मंदिरात एकट्याने बसत असत. मौन धारण करत, कोणाशी बोलत नसत, कोणाकडून काही स्वीकारत नसत.
१६ डिसेंबर १९७७ रोजी मुंबईतील लालबाग येथील हनुमान मंदिरात रात्री १०:२५ वाजता अनंतात विलीन झाले.
कणकवलीतील आश्रमात भालचंद्र महाराजांची समाधी आहे. समाधी स्थळ हे भक्तांसाठी श्रद्धास्थान असून दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात.
प.पू. भालचंद्र महाराज संस्थान समिती ही नोंदणीकृत संस्था असून धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करते. संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि विविध सेवाभावी उपक्रम राबवले जातात.